8 कंपन्यांच्या बाजार भांडवलात 1 लाख 10 हजार कोटींची भर
मागच्या आठवड्यातील चित्र : सेन्सेक्स 716 अंकांनी होता वाढला
वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील आघाडीवरच्या दहा मौल्यवान कंपन्यांपैकी आठ कंपन्यांचे बाजार मूल्य मागच्या आठवड्यामध्ये 1 लाख 10 हजार कोटी रुपयांनी वाढले असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.
मागच्या आठवड्यामध्ये 30 समभागांचा बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 716 अंकांनी वाढून बंद झाला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, आयटीसी आणि हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड या कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या वर्षी वाढले आहे तर दुसरीकडे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि इन्फोसिस या कंपन्यांचे बाजार भांडवल 38 हजार 477 कोटी रुपयांनी घटले असल्याचे दिसून आले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे बाजार भांडवल 43 हजार 976 कोटी रुपयांनी वाढून 20 लाख 20 हजार 470 कोटी रुपयांवर पोहोचले होते. दुसरीकडे रिलायन्स कंपनीचे समभाग 52 आठवड्यानंतर 2966 रुपयांवर सर्वकालिक उच्चांकावर पोहोचले होते. आयसीआयसीआय बँकेचे बाजार भांडवल 27 हजार 12 कोटी रुपयांनी वाढून 7 लाख 44 हजार 808 कोटी रुपयांवर पोहोचले होते. दुसरीकडे विमा क्षेत्रातील दिग्गज कंपनी एलआयसीचे बाजार भांडवल 17,235 कोटींनी वाढून 6,74,655 कोटी रुपयांवर पोहोचले होते. आयटीसीच्या बाजार भांडवलामध्ये 8548 कोटी रुपयांची भर पडून ते 5 लाख 13 हजार 640 कोटी रुपयांवर पोहचले. हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार भांडवल 4 हजार 534 कोटी रुपयांनी वाढून 5 लाख 62 हजार 574 कोटी रुपयांवर पोहोचले होते.