पाकिस्तानातील 1 कोटी लोक भुकेकंगाल होण्याची शक्यता
जागतिक बँकेच्या द्वैवार्षिक अहवालात दावा
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानातील आर्थिक परिस्थिती सध्या आहे तशीच राहिली, तर नजीकच्या भविष्यकाळात त्या देशातील आणखी एक कोटी लोक भुकेकंगाल होण्याची शक्यता आहे, असे जागतिक बँकेने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. बँकेचा द्वैवार्षिक अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात अनेक देशांचा आर्थिक परामर्ष घेण्यात आला असून पाकिस्तानवर भर देण्यात आला आहे.
पाकिस्तानने त्याची अर्थसंकल्पीय ध्येये पूर्ण केलेली नाहीत. सातत्याने तीन वर्षे हा देश आर्थिक घाट्यात आहे. जागतिक बँकेने पाकिस्तानला आर्थिक पॅकेज दिल्यानंतर त्या देशाच्या परिस्थितीत सुधारणा होईल, अशी शक्यता बँकेने व्यक्त केली होती. तथापि, त्या देशाचा प्रवास उलट्या दिशेने होत आहे. त्या देशातील गरिबी दिवसेंदिवस वाढत असून आणखी एक कोटी लोक दारिद्र्याच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या आर्थिक विकासाचा दर गेली काही वर्षे अवघा 1.8 टक्क्यांवर स्थिरावला आहे. आर्थिक गर्तेतून बाहेर पडण्यासाठी त्या देशाला किमान 5 टक्क्यांचा विकास दर राखण्याची आवश्यकता आहे. दुसऱ्या बाजूला गरिबी वाढण्याचा दर मात्र जवळपास 6 टक्के इतका मोठा आहे. पाकिस्तानातील एकंदर 40 टक्के लोकसंख्या सध्या दारिद्र्या रेषेखाली आहे. पाकिस्तानने ही परिस्थिती सुधारायला हवी, अशी सूचना अहवालात आहे.
शेतीत प्रगती, पण...
कृषी क्षेत्रात या देशाने प्रगती दाखविली आहे. या प्रगतीचा लाभ गरिबांना होऊन त्यांचे जीवनमान सुधारेल अशी अपेक्षा होती. तथापि, कृषी क्षेत्राने दिलेला लाभ वाढती महागाई आणि तोट्यातील अर्थव्यवस्थेमुळे पुसला गेला आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांच्या वेतनात गेल्या तिमाहीत केवळ 5 टक्के वाढ झाली असून महागाई दरात मात्र, 30 टक्के वाढ झाली आहे. उत्पन्न आणि महागाई यांच्यातील या अंतरामुळे कोट्यावधी लोकांसमोर भुकेचे संकट उभे राहिले आहे, असे या अहवालात विस्ताराने आणि उदाहरणासहित स्पष्ट केले गेले आहे.
अन्नसुरक्षा धोक्यात
कृषी क्षेत्राची प्रगती होऊनही व्यवस्थापनाचा अभाव असल्याने पाकिस्तानच्या कित्येक भागांमध्ये अन्नसुरक्षा धोक्यात आली आहे. दुर्गम प्रदेशातील लोकांपर्यंत अन्नधान्ये पोहचविण्यासाठी पुरेशी आणि विश्वासार्ह व्यवस्था नाही. सार्वजनिक वितरण व्यवस्थेची दुर्दशा झाली आहे, असेही अहवालात नमूद आहे