राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची राज्य सरकारला नोटीस
बेळगावनजीकच्या ‘त्या’ गावातील घटनेसंबंधी मागविली माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेळगाव तालुक्यातील ‘त्या’ गावातील अमानवीय घटनेसंबंधी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. नेटिसीला 4 आठवड्यात उत्तर द्यावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
बेळगाव तालुक्यातील त्या गावात घडलेल्या घटनेसंबंधी मानवाधिकार आयोगाने राज्य सरकारचे मुख्य सचिव आणि राज्य पोलीस महासंचालकांना नोटीस बजावली आहे. अशा अमानुष घटनांमुळे महिलांच्या हक्कांचे उल्लंघन होत आहे. दुर्बल वर्गाचे विशेष करून महिला, मुले आणि वृद्धांचे रक्षण करणे राज्य सरकारचे कर्तव्य आहे, असे आयोगाने म्हटले आहे.
प्रकरणासंबंधी एफआयआर नोंदी, तपासातील प्रगती, आरोपींवरील अटकेची कारवाई, त्या पीडित महिलेला मदत आणि राज्यात अशा घटना घडू नयेत, याकरिता केलेल्या उपाययोजनांविषयी देखील नोटिसीवरील उत्तरात नमूद करावे, अशी सूचना राज्य सरकारला देण्यात आली आहे.