राजकारणबाह्या मुद्देही महत्वाचे
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नेहमीच्या मुद्द्यांवर तर राजकीय पक्षांकडून भर दिला जाईलच. पण राजकारणाशी संबंध नसलेले मुद्देही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या परिणामकारक ठरतील. मतदाराचा कल या मुद्द्यांमुळे प्रभावित होऊ शकतो.
ड अयोध्येतील राममंदीर
अयोध्येत रामजन्मूमीच्या स्थानी निर्माणाधीन असणारे श्रीराममंदीर हा सर्वात महत्वाचा मुद्दा असू शकतो. 22 जानेवारी 2024 या दिवशी या भव्य मंदिराच्या गर्भगृहात श्रीरामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा वैदिक पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. यामुळे शतकोट्यावधी भारतीयांच्या अपेक्षेची पूर्तता झाली आहे. भारतीय जनता पक्षाकडून या पक्षाच्या स्थापनेपासून दिल्या गेलेल्या आश्वासनांपैकी सर्वात महत्वाचे आश्वासनही अशा प्रकारे पूर्ण झाले आहे. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण सर्व विरोधी पक्षांच्या प्रमुखांना देण्यात आले होते. तथापि, कोणत्याही विरोधी पक्ष प्रमुखाने या आमंत्रणाचा स्वीकार न केल्याने तो राजकीय मुद्दा बनला आहे. याच्या परिणामाविषयी सर्वांना उत्सुकता आहे.
ड सनातन धर्म
चार महिन्यांपूर्वी तामिळनाडू राज्यातील द्रविड मुन्नेत्र पक्षाच्या काही नेत्यांनी सनातन धर्माविरोधात केलेल्या अनुचित आणि अश्लाघ्य भाषेने खळबळ उडाली होती. सनातन धर्म हा कोरोना, महारोग आदी रोगांचा जंतूसारखा आहे. हे जंतू मारल्याशिवाय गत्यंतर नसते. त्यामुळे सनातन धर्म तशाच प्रकारे संपविला पाहिजे, असा अर्थाचे ते विधान होते. यामुळे प्रचंड गदारोळ निर्माण झाला. यात द्रमुकचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसची मोठी कोंडी झाली. काँग्रेसने लगोलग या विधानशी आपण सहमत नसल्याचा दावा करुन हात झटकले. तथापि, काही काँग्रेसच्याच नेत्यांनी या विधानांची री ओढल्याने केंद्रीय नेतृत्वाला सारवासारवी करावी लागली. हा मुद्दा थेटपणे राजकीय नाही. पण परिणामासंबंधी उत्सुकता आहे.
ड जागतिक घडामोडी
जागतिक घडामोडींचा सहसा परिणाम भारतातील लोकसभा निवडणुकीवर होत नाही. तथापि, रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-हमास युद्ध, चीनचा वाढता वर्चस्ववाद आदी मुद्द्यांमध्ये भारताची भूमिका कोणती, हा प्रश्नही महत्वाचा ठरला आहे. भारताने शांततेच्या मार्गाने वाटाघाटी करुनच संघर्षाच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यात आला पाहिजे. सध्याचे युग हे युद्धाचे नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. हे भारताबाहेरील मुद्दे जागतिक राजकारणाच्या दृष्टीने अधिक महत्वाचे आहेत. तथापि, जागतिक दृष्टीने भारतचे महत्व अलिकहे पूर्वीपेक्षा खूपच वाढल्याने या प्रश्नांवर भारत काय करत आहे, हा मुद्दा या निवडणुकीतही लक्षणीय ठरु शकतो. सत्ताधारी पक्षाच्या काही भूमिका विरोधकांकडून लक्ष्य केल्या जाऊ शकतात.