खाद्यतेलाचे दर कमी होण्याची शक्यता
सरकारकडून कंपन्यांना सूचना : स्वस्त आयात करून महाग दरात विक्री अयोग्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर कमी झाले आहेत. तरीही देशांतर्गत बाजारपेठेत खाद्यतेलांचे दर कमी होत नसल्याचे चित्र आहे. डिसेंबर महिन्यात खाद्यतेलाचे दर काही प्रमाणात कमी झाले होते, परंतु जानेवारीमध्ये पुन्हा खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. पुढील काही महिन्यांमध्ये लोकसभा निवडणूक होणार असल्याने सरकार खाद्यतेलांच्या दराप्रकरणी अत्यंत सतर्क आहे. याचमुळे सरकारकडून खाद्यतेल कंपन्यांना उत्पादनाची किंमत आंतरराष्ट्रीय दराच्या धर्तीवर घटविण्याची सूचना करण्यात आली आहे.
केंद्रीय ग्राहक विषयक मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती कमी होत असल्याने देशांतर्गत बाजारातही त्याच्या किमती कमी व्हाव्यात असे या कंपन्यांना सांगितले आहे. परंतु या कंपन्यांनी सध्या दर कमी करण्यास असमर्थता दर्शविली आहे. नवे पिक आल्यावरच किमती कमी करता येणे शक्य असल्याचे कंपन्यांचे सांगणे आहे, यामुळे मार्च महिन्यात खाद्यतेलाचे दर कमी होण्याची शक्यता आहे.
सोयाबीन, सूर्यफुल आणि पाम तेल यासारख्या खाद्यतेलांवरी एमआरपी आंतरराष्ट्रीय स्तरावर याचे दर कमी होऊनही कमी करण्यात आले नाहीत असे ग्राहक विषयक मंत्रालयाने नमूद केल्याची माहिती सॉल्वेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अजय झुनझुनवाला यांनी सदस्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
खाद्यतेलाचे दर तत्काळ कमी होण्याची शक्यता नाही. खाद्यतेलाच्या किमती सध्या स्थिर आहेत. किमतींमध्ये कुठलीच मोठी वाढ किंवा घट झालेली नाही. आमचा एमआरपी दर महिन्याच्या वर्तमान मूल्यानुसार बदलला जातो असे अदानी विल्मरचे सीईओ अंशु मलिक यांनी सांगितले आहे. अदानी विल्मर ही कंपनी ‘फॉर्च्यून’ ब्रँड अंतर्गत खाद्यतेलाची विक्री करते.
डिसेंबर महिन्यात खाद्यतेलाच्या किमतीत सुमारे 10 टक्क्यांची घट झाली होती. तर जानेवारीमध्ये या किमती पुन्हा 8 टक्क्यांनी वाढल्या आहेत. सरकारने अधिक जोर दिल्यास किमतींमध्ये 3-4 टक्क्यांची कपात केली जाऊ शकते असे व्हेजिटेबल ऑयल ब्रॉकरेज कंपनी सनविन ग्रूपचे सीईओ संदीप बाजोरिया यांनी म्हटले आहे.