‘कोटीतीर्थ’वर खर्च केलेले 2 कोटी ‘पाण्यात’
कोल्हापूर / विनोद सावंत :
महापालिकेने सुमारे 2 कोटींच्या निधीतून कोटीतीर्थ तलावाचे सवंर्धन आणि सुशोभिकरणाचे कामे केली. परंतू तलावातील पाणी प्रदूषित होणे सुरच आहे. कामे करून दोन वर्ष झाले नाही तोपर्यंत तलावातील पाण्यावर पुन्हा हिरवा तवंग आला आहे. त्यामुळे महापालिकेने नेमकी काय कामे केली असा सवाल आता उपस्थित होत आहे.
रंकाळा तलाव, कोटीतीर्थ तलाव हे शहरातील पारंपरिक जलस्त्राsत असणारे तलाव आहेत. या तलावाना ऐतिहासिक महत्व आहे. या तलावाचे संवर्धन करणे जतन करण्याची जबाबदारी कोल्हापूर महापालिकेकडे आहे. गेल्या काही वर्षापासून या तलावाच्या परिसराची दुरवस्था होत आहे. तलावातील पाणी प्रदूषित होत आहे. परिसरातील सांडपाणी मिसळत असल्याने जलचर प्राण्याचे भवितव्य धोक्यात आले आहे. कोल्हापुरातील मुख्य पर्यटनस्थळापैकी एक असणाऱ्या रंकाळा तलावाचीही दुरवस्था झाली आहे. राज्य शासनाने रंकाळा तलावासाठी 9 कोटींचा निधी दिला. यातून तलावातील पाणी शुद्ध करण्यासाठी काहीच उपया योजना केल्या नाही. या उलट बाह्या सुशोभिकरणावरच खर्च केला.
दुसरीकडे कोटीतीर्थ तलावामध्ये मासे, कासव मृत होण्याच्या घटना वाढल्याने सामाजिक संस्था, परिसरातील नागरिकांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. तलावात परिसरातील सांडपाणी मिसळत असल्याने ही स्थिती निर्माण होत असल्याचा प्राथमिक अंदाज होता. तलावातील गाळ काढणे, सांडपाणी वळविण्यासाठी कोट्यावधीचा खर्च होता. राज्य शासनाकडून निधी मिळाला नसल्याने महापालिकेने अखेर कोटीतीर्थ तलावाचे स्वनिधीतून संवर्धन आणि सुशोभिकरणचा निर्णय घेतला. बजेटमध्ये 2 कोटींच्या निधीची तरतूदही केली. ठेकेदारामार्फत कोटीतीर्थ तलावातील जलपर्णी हटविण्यात आली. 300 डंपर गाळ काढण्यात आला. काम पूर्ण होवून वर्ष झाल्यानंतर तलावातील पाणी प्रदूषित होण्यास पुन्हा सुरवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तलावात हिरव तवंग वाढला आहे.
एकीकडे महापालिका तलावावर दोन कोटींचा खर्च केल्याचा दावा करत आहे. परिसरातून तलावात मिसळणारे सांडपाणी वळविण्यात आल्याचे सांगत आहे. मग असे असताना पुन्हा तलावातील पाणी प्रदूषित कसे होत आहे. 2 कोटींची केलेली कामे वाया गेली का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
- नागरिकांचीही जबाबदारी
महापालिकेने गाळ काढण्यासाठी तलावातील पूर्वीचे प्रदूषित पाणी पंपाने बाहेर काढले. यानंतर झालेल्या पावसाने तलाव पूर्ण भरला आहे. तलावाती पाणी पुन्हा हिरवे झाले आहे. वास्तविक तलावात दोन कोटींची कामे झाल्यानंतर येथे जनावरे आणि कपडे धुणे बंद करणे अपेक्षित होते. परंतू तसे होताना दिसून येत नाही. नागरिकांनीही तलावाची निगा राखणे गरजेचे आहे अन्यथा मनपाने कितीही निधी खर्च केला तरी त्याचा उपयोग होणार नाही, हे वास्तव आहे.
कोटीतीर्थसाठी निधी - 2 कोटी
कामाची मुदत - ऑगस्ट 2023 पर्यंत
गाळ उठाव - 300 डंपर
- कोटीतीर्थ तलावात 2 कोटीतून झालेली कामे
तलावातील जलपर्णी काढणे, गाळ काढणे, कंपाऊड वॉल उभारणे, तलावात वॉटर फौंऊटन बसविणे, ऑक्सिजन पार्क करणे.
- पाण्याचे नमुने तपासण्यासाठी पाठवू
कोटीतीर्थ तलावात जाणारी पाईपलाईन वळवली आहे. परिसरातील ड्रेनेजलाईनही पूर्ण झाली आहे. या व्यतरिक्त काही ठिकाणहून सांडपाणी तलावात जाते का याची तपासणी केली जाईल. पाण्याचे नमुनेही घेवून तपासणीसाठी पाठवण्यात येतील.
हर्षजित घाटगे, जल अभियंता, महापालिका