‘मुंबई’ला बदलण्याची मोठी योजना - राज ठाकरे
मुंबई :
मुंबई ही मराठी माणसाच्या हातात आहे. पण भविष्यात हे चित्र पूर्णपणे बदलून टाकण्याच्या हालचाली सुरु असल्याचा दावा, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला. ते शुक्रवारी एका वृत्तवाहीनीच्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी भविष्यात संपूर्ण मुंबईचा चेहरामोहरा कसा बदलला जाऊ शकतो, याची सविस्तर मांडणी यावेळी केली आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र राज ठाकरेंवर भाष्य करताना राज सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरणार असल्याचे भाष्य करत त्यांना ठाकरेंना टोला लगावला आहे.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘मला 2024 ते 2025 यादरम्यान एक व्यक्ती भेटली होती. त्या व्यक्तीने मला मुंबईत आगामी काळात होऊ घातलेल्या गोष्टी आणि आराखडा ऐकून मी हबकून गेलो. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांना इतका उशीर त्यासाठीच झाला. कारण राज्य सरकारला काही गोष्टी या प्रशासकामार्फत करुन घ्यायच्या होत्या. निवडणूक होऊन दुसऱ्या पक्षाचे सरकार आल्यावर त्रास नको म्हणून या सर्व गोष्टी आधीच करायच्या होत्या’ असेही त्यांनी स्पष्ट केले..
देवेंद्र फडणवीस हा बसवलेला माणूस : राज ठाकरे
मुंबई फक्त ठाकरेंच्या हातातच सुरक्षित का आहे, इतर पक्षांच्या हातात का नाही, असा प्रश्न यावेळी राज ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी म्हटले की, होय मुंबई फक्त ठाकरेंच्या हातातच सुरक्षित आहे. मुंबई ही केंद्रशासित करण्याचा डाव 100 टक्के आहे. देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचे सहकारी असणारे जे महाराष्ट्रातील नेते आहेत, ही बसवलेली माणसं आहेत, बसलेली नाहीत. ठाकरेंच्या वरती कोणी नाही. त्यांना जे वरुन सांगितलं जाणार, ज्या कागदावर सह्या करायला सांगितल्या जाणार, तिकडे ते सह्या करणार. याचं उदाहरण म्हणजे देवनारचे डंपिंग ग्राऊंड अदानींना देण्यात आले. यांनी फक्त कागदावर सह्या केल्या, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
राज ठाकरे मोठ्या पराभवाचे धनी होतील ; देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी
राज ठाकरे हे फक्त पराभूत होणार नाहीत,तर इतिहासात सर्वात मोठ्या पराभवाचे धनी म्हणून ओळखले जातील, मी आज भविष्यवाणी करतो. निकाल आल्यानंतर तुम्ही पाहा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याबाबत भविष्यवाणी केली. तसेच जन्मामुळे मालमत्ता मिळू शकते. पण विचारांचा वारसा मिळत नाही. यांना विचारांचा वारसा मिळालेला नाहीय, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.