ब्राह्मीस्थिती
अध्याय नववा
भक्ताने बाप्पांच्या चरणी लीन होऊन स्वत:चा उद्धार करून घ्यावा अशी बाप्पांची फार इच्छा आहे पण त्यामध्ये माणसाच्या मन आणि बुद्धीचा मोठाच अडथळा असतो, ह्याची त्यांना जाणीवही आहे. त्यांच्या चरणी मन एकाग्र करण्यासाठी प्रथम ते भक्ताला मन आणि बुद्धी त्यांना अर्पण करण्याचा सल्ला देतात. ते जमत नसेल तर अभ्यास आणि योगाचा पर्याय सांगितला. त्यांच्यामुळे मनाचं भरकटणं बंद होऊन मन ईश्वराच्याठायी एकाग्र होईल असा उद्देश त्यामागे आहे. ज्यांना अभ्यास आणि योग जमण्यासारखा नाही त्यांना बाप्पांनी सांगितलं की, काहीतरी कर्म केल्याशिवाय तुला चैन पडणार नाही म्हणून तू असं कर की, केलेलं कर्मच मला अर्पण करून टाक पण मी कर्म केलंय हे काही केल्या डोक्यातून जात नाही. म्हणून बाप्पा भक्तापुढं असा पर्याय ठेवतात की, कर्म मला अर्पण करायची इच्छा तुला नाहीये ना, ठीक आहे तू त्या कर्माच्या फलाचा त्याग करून टाक. म्हणजे तू केलेल्या कर्माच्या फळाच्या अपेक्षेत गुंतून तू तुझी मन:शांती घालवून बसणार नाहीस. माणसाचा आत्मोद्धार होण्यासाठी मन:शांती फार महत्त्वाची आहे
हे अधिरेखीत करण्यासाठी पुढील श्लोकात बाप्पा सांगतायत की, मन:शांती ही सर्वश्रेष्ठ होय.
श्रेयसी बुद्धिरावृत्तेस्ततो ध्यानं परं मतम् ।
ततोऽ खिलपरित्यागस्ततऽ शान्तिर्गरीयसी ।। 14 ।।
अर्थ- कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे, ध्यानापेक्षा सर्वांचा त्याग श्रेष्ठ आहे आणि सर्वत्यागापेक्षा शान्ति श्रेष्ठ आहे.
विवरण- माणसाला जीवनात सुख व शांती यांचीच आंस असते. सुखाची प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी असू शकते. पण मनाची शांती तेव्हाच मिळेल जेव्हा भविष्यकाळाची चिंता नाहीशी होईल. आपण आपलं काम नीट करू, मग काय व्हायचं ते होईल, अशी मनाची धारणा आपल्याला शांती देईल. आपल्यातला ईश्वर आपल्याकडून सर्व कर्मे करून घेत आहे हे लक्षात घेतले की, आपोआपच आपण करत असलेले कर्म त्याची इच्छा असेल तितकेच पूर्ण होणार किंवा कदाचित पूर्णही होईल पण ते मी केले म्हणण्यात काहीच अर्थ नाही किंवा पूर्ण झाले म्हणून खुश होण्याचे कारण नाही किंवा अपूर्ण राहिले म्हणून दु:खी होण्यालाही काही अर्थ नाही हे ज्ञान होणे व ते मनावर बिंबणे फार महत्त्वाचे आहे. असे झाले की, केलेल्या कर्माकडून अपेक्षा बाळगणे आपोआप बंद होईल. अपेक्षा करणे बंद झालेल्या मनुष्याचे ध्यान ईश्वराप्रति एकवटले जाईल. त्याच्या सर्व अपेक्षा संपल्याने केवळ आणि केवळ ईश्वराचे विचार त्याच्या मनात येत राहतील कारण ध्यान म्हणजे सतत विचार करणाऱ्या अस्वस्थ मनाला शांत करणे. त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो. ध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे. डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा आणि आपल्या आवडत्या दैवताच्या मूर्तीवर लक्ष केंद्रित करा. तसे केले की मन शांत होते. त्यामुळे त्याची आत्मशक्ती, ऊर्जा जपली जाते. ही ऊर्जा माणसाला आरोग्य, मन:शांती व विवेक-ज्ञान प्रदान करते. ध्यानाचा सराव करणारा साधक आपोआपच शांतिरुप होईल आणि ईश्वराच्याठायी एकाग्र होऊन ध्यान करू शकेल. या सर्वाची सुरुवात कर्मफळाच्या त्यागातून होते. म्हणून ध्यानापेक्षा त्याग श्रेष्ठ आणि या त्यागातून मिळणारी शांती सर्वश्रेष्ठ होय. भगवदगीता म्हणते, सोडूनि कामना सर्व फिरे होऊनि नि:स्पृह । अहंता ममता गेली झाला तो शांति-रूप चि ।। 2.71।। शांतिरुप होणं ही ब्राम्ही स्थिती आहे आणि ती मिळवण्यासाठी कर्मफळाचा त्याग ही गुरुकिल्ली आहे. पुढे श्रीकृष्ण सांगतात, अर्जुना स्थिती ही ब्राम्ही पावता न चळे पुन्हा । टिकूनि अंत-काळी हि ब्रम्ह-निर्वाण मेळवी ।। 72 ।। सदैव मन:शांती मिळवण्याच्या स्थितीला भगवंत ब्राह्मीस्थिती असं म्हणतात.