बेंगळूर, कारवारसह देशभरात सुरक्षा सराव
आपत्कालिन परिस्थितीला तोंड देण्यासाठी नागरिकांत जागृती : सायरन, ब्लॅक आऊटसह सुरक्षा उपायांचे प्रात्यक्षिक
प्रतिनिधी/ बेंगळूर
पहलगामधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानी दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. दरम्यान, युद्धजन्य परिस्थितीच्या पा पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी बेंगळूर, कारवार, रायचूरसह देशातील 259 ठिकाणी सुरक्षा सरावांचे (मॉक सिक्युरिटी ड्रिल) प्रात्यक्षिक पार पडले. बेंगळूरसह देशातील विविध ठिकाणी दोन मिनिटे सायरन, ब्लॅक आऊट आणि नागरिकांनी करावयाच्या सुरक्षा उपायांचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
केंद्रीय संरक्षण मंत्रालय आणि गृहमंत्रालयाच्या निर्देशांनुसार राज्यात बेंगळूर, रायचूर आणि कारवार जिल्ह्यात मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले. बेंगळूरबरोबरच दिल्ली, बिहार, गोवा, उत्तरप्रदेशामध्येही ब्लॅक आऊनचे प्रात्यक्षिक पार पडले. आपत्कालिन परिस्थितीला तोंड देण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी कर्नाटक राज्य अग्निशमन आणि आपत्कालिन सेवा खात्याने आयोजिलेल्या जागृती कवायत ‘ऑपरेशन अभ्यास’ बेंगळूरच्या हलसूर येथे पार पडला. नागरिकांच्या गैरसोय विचारात घेऊन पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून बेंगळूरमध्ये केवळ हलसूर परिसरात ब्लॅक आऊटची सूचना देण्यात आली. त्यामुळे केवळ हलसूरमध्येच वीजपुरवठा बंद करण्यात आला.
बेंगळूरमधील चामराचपेठ, वय्यालिकावल मल्लेश्वरमसह 35 ठिकाणी दुपारी 3:48 ते 4 या वेळेत दोन मिनिटे सायरन वाजविण्यात आले. उप्पारपेठ पोलीस स्थानक, कमर्शिअल स्ट्रीट, राजाजीनगर अग्निशमन स्थानक, हलसूर गेट येथे यद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा सराव करण्यात आला.
हलसूर येथे अग्निशमल दलाने काल्पनिक आपत्कालिन परिस्थिती निर्माण करणे, नागरिकांना वाचविणे, आग नियंत्रणात आणणे आणि जखमींवर प्रथमोपचार करणे यासह विविध प्रकारच्या सरावांचे प्रात्यक्षिके बुधवारी आयोजित केली. सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी तातडीने घ्यावयाची खबरदारी आणि आपत्तीमुळे इमारतींमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरसज्ज एरियल लॅन्डर वाहनाचा वापर करून बचाव करणे याचे प्रात्यक्षिक अग्नीशमन दलाच्या जवानांनी सादर केले.
याप्रसंगी गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर म्हणाले, केंद्र सरकारने सर्व राज्यांना जनतेमध्ये जागरूकता निमार्ण करण्याचे निर्देश याआधीच दिले आहेत. नागरिकांचे संरक्षण कसे करावे?, युद्धजन्य परिस्थितीत जनतेच्या जबाबदाऱ्या काय असतात, अराजकतेच्या काळात शांतता कशी राखता येईल, जखमींना रुग्णालयात नेण्यापासून इतर परिस्थिती कशी हाताळावी, याचे ‘ऑपरेशन अभ्यास’च्या माध्यमातून जनतेत जागरूकता निर्माण केली जात आहे.
सुरक्षा व्यवस्थेत वाढ : डॉ. परमेश्वर
जलाशय, अणूप्रकल्प, वीजनिर्मिती केंद्रे, औद्योगिक वसाहती, दाट लोकवस्तीची ठिकाणे, बंदरे या ठिकाणांना अधिक सुरक्षा पुरविण्यात आली आहे. येथे औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. रायचूरच्या शक्तीनगर येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्र आणि कारवारमध्ये अणूऊर्जा प्रकल्प तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचे शहर असलेल्या बेंगळूरमध्ये सतर्कता बाळगण्यात आली आहे, असे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी सांगितले.
इस्रो, डीआरडीओला कडेकोड सुरक्षा
बेंगळूरमध्ये इस्रो, डीआरडीओ, एचएएल आणि संरक्षण खात्याशी संबंधित ठिकाणांवर केंद्र सरकारने सुरक्षा वाढविली आहे. गुप्तचर यंत्रणांनाही अलर्ट राहण्याची सूचना देण्यात आली आहे. कर्नाटक किनारपट्टीवरही हाय अलर्ट देण्यात आला आहे. तटरक्षक दलाच्या जवानांनी अरबी समुद्रात गस्त वाढविली आहे. मंगळूर बंदरावरही सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. मच्छीमारी होड्या, मच्छीमारांची तपासणी केली जात आहे.