पाकच्या ताब्यातील जवानाच्या मुक्ततेला होणार विलंब
बैठकीसाठी तयार नाही पाकिस्तानी रेंजर्स
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाकिस्तानवरील भारताच्या स्ट्राइकनंतर दोन्ही देशांदरम्यान तणाव वाढला आहे. या स्थितीत पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या बीएसएफ जवानाच्या मुक्ततेला विलंब होणार आहे. बीएसएफकडून दररोज स्वत:च्या जवानाच्या मुक्ततेसाठी प्रयत्न केले जात आहेत, परंतु पाकिस्तानी रेंजर्स आता कुठलाही प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे. बीएसएफ आणि पाकिस्तानी रेंजर्सदरम्यान 6 बैठका झाल्या आहेत, परंतु आता ध्वजबैठकीसाठी बीएसएफ ज्या पॉइंटवर ध्वज दाखविते, तेथे पाकिस्तानी रेंजर्स पोहोचत नाहीत. पाकिस्तानी रेंजर्सच्या सर्वोच्च मुख्यालयातून आदेश आल्यावरच ही बैठक होऊ शकते असे समजते.
पंजाबच्या फिरोजपूरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर चुकून पाकिस्तानी हद्दीत शिरलेला बीएसएफ जवान पीके साहूला तेथील रेंजर्सनी स्वत:च्या ताब्यात घेतले होते. आता पाकिस्तानी रेंजर्स बीएसएफ जवानाच्या मुक्ततेवरून काहीच बोलत नसल्याचे चित्र आहे. जवानाच्या सुखरुप वापसीसाठी बीएसएफकडुन सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफ दररोज दोन ते तीनवेळा शिटी वाजवून किंवा झेंडा दाखवून पाकिस्तानी रेंजर्सला चर्चेचा संकेत देते.
याप्रकरणी पाकिस्तानी रेंजर्ससोबत सुमारे 6 बैठका झाल्या आहेत, तरीही याप्रकरणी कुठलाही तोडगा निघालेला नाही, अशास्थितीत बीएसएफकडुन रेंजर्सना वरिष्ठ कमांडर स्तराच्या बैठकीसाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. चर्चेचा प्रयत्न प्रतिदिन केला जातोय. मुख्यालयातून आदेश मिळाला तरच ही बैठक होणार असल्याचे रेंजर्सकडून आता सांगण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर दोन्ही देशांदरम्यान तणाव वाढल्याने बीएसएफ जवानाच्या मुक्ततेला विलंब होऊ शकतो. पाकिस्तानी रेंजर्ससाठी दीर्घकाळापर्यंत बीएसएफ जवानाला स्वत:च्या ताब्यात ठेवणे शक्य नसेल.
बीएसएफ जवानाची मुक्तता सुनिश्चित करण्यासाठी मुत्सद्देगिरीचीही मदत घेतली जात आहे. चुकून दुसऱ्या देशाच्या हद्दीत जाणे मोठा अपराध नाही. दोन्ही देशांच्या सुरक्षा दलांना अशाप्रकारच्या स्थितीला यापूर्वीही सामोरे जावे लागले आहे. अनेकदा तर काही तासांत किंवा एकाच ध्वजबैठकीत यावर तोडगा काढला जात असतो. परंतु यावेळी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबद्दल कठोर भूमिका घेतल्याने बीएसएफ जवानाच्या वापसीत विलंब होत आहे.
बीएसएफ जवान पीके साहू 182 वी बटालियन बॉर्डर गेट क्रमांक 208/1 वर तैनात होता. पीक कापणीदरम्यान तो भारतीय शेतकऱ्यांवर नजर ठेवत होता. बीएसएफ जवान शेतकऱ्यांची सुरक्षा देखील करतात. तेथील तीव्र उष्णतेदरम्यान जवानाने वृक्षाच्या सावलीत उभे राहण्याचा प्रयत्न केला असता पाकिस्तानी रेंजर्सनी त्याला ताब्यात घेतले. त्याची सर्व्हिस रायफलही जप्त करण्यात आली.